Thursday, January 14, 2010

द मिस्ट


’देअर इज समथिंग इन द मिस्ट’ असं ओरडत,नाक फ़ुटलेल्या अवस्थेत तो त्या सुपरमार्केट मध्ये शिरतो.त्याच्या सांगण्यावरुन त्य दुकानाचे दरवाजे बंद करण्यात येतात.दुकानासमोर साचलेल्या घट्ट मिस्टसारखच आपल्या मनात देखील एक वेगळच ’मिस्ट’ साचयला सुरुवात होते.

नोर्मली साय-फ़ाय सिनेमे फ़क्त इफ़ेक्ट,वैद्यानिक संकल्पना आणि गूड एन्डिंग एवढच देतात.किंबहुना आपली अपेक्षाच तेवढी असते. मात्र मिस्ट कुठेतरी साय-फ़ाय असून सुद्धा नकळतच ह्या सीमारेषा ओलांडून पुढे जातो.स्टीफन किंग ह्यांच्या कादंबरीवर आधारलेला आणि दिग्दर्शक फ़्रॆन्क डाराबोंटचा द मिस्ट हा रहस्य आणि हॊरर चित्रपटांची चौकट मोडतोच मात्र मानवातल्या राक्षसालादेखिल सगळ्यांसमोर आणतो.



आता हा चित्रपट सुरु होतो तो वादळाने आणि जणू काही येणारया वादळाची जाणीव दिगदर्शक इथुनच करुन देतो.डेविड ड्रेटोन (थोमस जेन) हे ह्या चित्रपटातलं प्रमुख व्यक्तिमत्व.तो चित्रपटांचे पोस्टर बनवतो.रात्री झालेलं वादळ आणि झाडांची पडझड ह्यामुळे डेविडचं बरचं नुकसान झालय.त्याच्या शेजारी राहणारया नोर्टन(आन्द्रे भ्रोहर) मुळे त्याच्या बोट हाऊसचा देखील सत्यानाश झालाय.झाड पडून ह्या नोर्टनची देखील गाडी उध्वस्त झालीये.सुपरमार्केटकडे निघालेले डेविड,त्याचा मुलगा,आणि नोर्टन रस्त्यात बरयाच सैनिकांना डोंगरच्या दिशेने जाताना पाहतात आणि विषय निघतो तो ’एरोहेड प्रोजेक्ट’चा.दुकानात पोहोचल्यावर चमत्कारिक रित्या वागणारे सैनिक,त्यांना ५ मिनिटे देणारा पोलिस ह्या सगळ्या गोष्टी गुंता वाढवतात.नंतर अतिशय घाबरलेला आणि नाकातून रक्त येत असलेला डॆन ’समथिंग इन द मिस्ट टूक जॊन ली’ असं ओरडत दुकानात शिरतो आणि दरवाजे लावायला सांगतो.दुकानातुन बाहेर पडलेला एक गाडीकडे जातो आणि येणारया धुक्यात झाकला जातो.थोडयाच वेळाने त्याचा किंकाळी ऐकु येते.धुक्यामुळे दुकानाबाहेर काय घडतय याची अजिबात जाणीव होतं नाही.मात्र बाहेर काहीतरी भयंकर घडतय याची जाणिव पदोपदी होते.यानंतर डेविडला स्टोररूम मध्ये येणारा अनुभव आणि त्याची खात्री करण्यासाठी स्टोररूम मध्ये डेविड आणि बरोबर गेलेले दुकानातले कर्मचारी त्यांच्या देखत कोणत्यातरी अपरिचित गोष्टीमुळे नोर्मचा होणारा म्रुत्यु ह्यावरुन त्यांना बाहेर काहीतरी विचित्र प्रकारच्या जीव फिरत आहेत ह्याची जाणीव होते.ह्या सगळ्या गोंधळात भर पडते ती म्हणजे मिसेस कारमोडी (मारशिआ गे हारडन) मुळे.देव आणि ’एन्ड ओफ़ डेज’ वैगेरे बद्दल बोलून ती अधिक त्रास देते.स्वतःला देवाने पाठवलं आहे,आणि हे सगळ आधीच लिहिलय अस सारखं सारखं सांगुन ती त्या लोकांवर फ़ार हॆमेरींग करते.त्याच रात्री विचित्र किडय़ांचं दुकानात शिरण आणि म्रुत्युमुखी पडणारे लोक हे सगळा प्रसंग बिकट बनवतात.दुसरया दुकानातून औषधं आणण्यासाठी गेलेल्या डेविड आणि मंडळींना सुरुवातीला सैनिकांना पाच मिनिटे देणारा पोलीस अतिशय विचित्र अवस्थेत सापडतो.’ही आमचीच चूक होती ’ अस म्हणटल्यावर साहजिकच आता आठवण होते ति ’एरोहेड प्रोजेक्टची’.दुकानात परत आल्यानंतर चित्रपट जवळपास एका दिवसाने पुढे जातो,मात्र आताची परिस्थिती वेगळी आहे.मिसेस कारमोडी जवळपास सगळ्यांच ब्रेनवॊश केलय.आता हि लोकं कारमोडीला देवाने पाठवलेली असून ती सांगेन तीच पूर्व दिशा मानत आहेत.डेविड,जेस्सप (सॆम विटवेर)ह्या सैनिकाला स्टोररूम मध्ये नेतो आणि एरोहेड बद्दल विचारतो.आता हा अएरोहेड प्रोजेक्ट म्हणजे काय आहे,त्याचा परिणाम कसा झालाय,आणि बाहेर काय कशामूळे घडतय हे साफ़ होत.मात्र एवढ्यात जिम(विलियम सॆडलर) ह्या जेस्सप ला सगळयांसमोर नेतो.आता ही मिसेस कारमोडी ख्रिश्चिनिटी आणि मानवाने देवासाठीच राखीव असणारया गोष्टींबद्दल केलेला हस्तक्षेप आणि ’एक्सपिएशन’ बद्दल बरच लेक्चर देते.जणूकाही ह्या जेस्सपमूळेच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत ह्यामूळे बिचारया जेस्सपची निर्घूण हत्या केली जाते.आता मात्र बाहेर पडल्याशिवाय मार्ग नाही हे समजल्यावर डेविड आणि त्याच्या बरोबरचे सहा जण बाहेर जायला निघतात.मात्र इथेही ही कारमोडी ह्यांना आडवी येते.’डेविडच्या मुलाला वेगळं करा आणि त्याला बाहेरच्या राक्षसाला सुपुर्त करा म्हणजे बाहेरचा राक्षस शांत होईल’असं म्हणणारया कारमोडीच पुढे काय होतं?,तसचं ही मंडळी बाहेर पडतात का,आणि ते जिवंत राहतात की म्रुत्यूमुखी पडतात?म्हणजे अर्थातच शेवट कसाय आणि का तो एवढा अर्थपूर्ण का आहे हे शोधण्यासाठी चित्रपट बघायलाच पाहिजे.

दिग्दर्शक फ़्रॆन्क डेराबोंटने ज्याप्रमाणे ’शौशन्क रेडेम्शन’मध्ये मानवी व्रुत्तीच सुरेख चित्रण केलय त्यापेक्षा किंचित जास्तच चांगल चित्रण द मिस्ट मध्ये झालय.संकट आल्यावर माणूस कोणावरही विश्वास ठेवतो,स्वतःचा जीव वाचावा ह्यासाठी अंधश्रद्धा आणि ह्या अंधश्रद्धांसाठी माणूस माणसाचा जीव घ्यायला सुद्धा कमी करत नाही ह्याच सुरेख चित्रिकरण डेराबोंटने केलय(जे अगदी खरयं).अप्रतिम सिनेमॆटोग्राफ़ी ह्या चित्रपटाची गूढता फ़ारच वाढवते.चित्रपटात भाव खाऊन जाणारी एकमेव व्यक्ति म्हणजे मारशिया गे हारडेन.तिचा अभिनय खरोखरीच फ़ारच नैसर्गिक आहे.तिचा अभिनय कुठे तरी आपल्याला सुद्धा चीडवून देतो.ह्या चित्रपटाचा शेवट बरयाच जनांना चुकीचा वाटतो.मात्र चित्रपटाचा शेवट हिच खरं चित्रपटाची ताकद आहे अस मला वाटतं.

अनिकेत सुरगुडे